तिनिधी: एक वर्ष मराठा आरक्षणासाठी लढा सुरू आहे.लाखोंची जनता रस्त्यावर उतरल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाईट वाटायला पाहिजे अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलनाचे सरसेनापती मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे.पाच दिवस उपोषण केल्याने त्यांच्या आरक्षणाची धग पुन्हा एकदा महाराष्ट्रात पेटली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी काही खाण्यापिण्यास नकार दिल्याने अनेक उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आल्याचे महाराष्ट्राने पाहिले होते.त्यातच आता पाचवा दिवस असल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे यांनी खाण्यापिण्यास नकार दिल्यानंतर अखेर लोकांनी केलेल्या आग्रहास्तव त्यांना सलाईन लावण्यात आले आहे.मात्र अशक्तपणा आल्याने त्यांना आपल्या समर्थकांसोबत नीट बोलता आले नाही.काल संध्याकाळी उपस्थितांना संबोधित करताना जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा अशक्तपणा जाणवत होता. घटनास्थळी डॉक्टरांचे पथक उपस्थित असल्याने मध्यरात्री पावणेदोन वाजता उपचार घेतले आहेत.मनोज जरांगे पाटील चौथ्या दिवशी चालण्यात असमर्थ ठरल्याने अंतरवाली सराटी येथे आंदोलन ठिकाणी उपस्थित असलेल्या महिलाही भावूक झाल्या होत्या.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरे गॅझेट लागू करावे, हैद्राबाद गॅझेट लागू करावे, मराठा व कुणबी समाज एकच आहे त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, मराठा बांधवांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे सरसकट मागे घ्यावेत, सातारा गॅझेट लागू करावे अश्या प्रमुख मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी केल्या होत्या. यापूर्वीही सकल मराठा समाजाचे लाखोंचे मोर्च महाराष्ट्रात शांततेत निघाले होते.एकनाथ शिंदे यांनी नेमलेल्या शिंदे समितीच्या अहवालातील निरीक्षणे लागू करत मराठा समाजाला शिक्षणात व नोकरीत आरक्षण देण्याचे मान्य केले. त्यानुसार मराठा समाजाला कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता स्वतंत्र १० टक्के आरक्षण दिले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. मात्र जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण देण्याची मागणी केल्याने अद्याप यावर तोडगा निघालेला नाही.
