रेल्वेस्टेशन, विमानतळावर छत्रपती संभाजीनगरचा नामोल्लेख करावा अशी अंबादास दानवेंची मागणी
छ. संभाजीनगर : छ. संभाजीनगर जिल्हा व शहराचे राज्य शासनाच्या वतीने नामांतरण करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या परवानगीने सदरील नामांतरण झाले आहे. मात्र,अद्याप शहरातील रेल्वेस्टेशन व विमानतळावर छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख होत नाही. त्यामुळे रेल्वे स्टेशन व विमानतळावर छत्रपती संभाजीनगरचा नामोल्लेख करावा, अशी मागणी आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परिषद सभागृहात केली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ व कृषी उत्पन्न बाजार समिती या स्थानिक संस्थावर सुद्धा छत्रपती संभाजीनगर असा नामोल्लेख होत नसल्याचे दानवे यांनी निदर्शनास आणून दिले. धाराशिव व अहिल्यानगरचे सुद्धा नुकतेच नामांतरण झाले आहे. येथील स्थानिक संस्थांवरही नव्या नावाचा नामोल्लेख करण्यात यावा, अशीही मागणी दानवे यांनी केली.
उत्तर प्रदेशातील फैझाबादचे एका रात्रीत आयोध्या असे नामांतरण झाले. मात्र राज्यात संभाजीनगर, धाराशिव व अहिल्यानगर यांचे नामांतर होऊन मोठा कालावधी गेला आहे. तरीही अद्याप येथील स्थानिक संस्थांवर नवीन नावाप्रमाणे उल्लेख का होत नाही ? असा प्रश्न देखील अंबादास दानवे यांनी उपस्थित केला.


बीड व परभणीतील घटना सरकार पुरस्कृत, बीड घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या: नाना पटोले 

