पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचे स्मरण आवश्यक- श्रीमंत अमरजीत राजे बारगळ

1 year ago 0 9

छत्रपती संभाजीनगर,(जिमाका):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या शासन काळात केलेले लोककल्याणकारी कार्याचे स्मरण हे आजच्या काळात होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन श्रीमंत अमरजीत राजे बारगळ यांनी आज येथे केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ३०० व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाने आयोजीत केलेल्या दोन दिवसीय विद्वत परिषदेचे १ जानेवारी २०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे उद्घाटन झाले. शुक्रवार दि.३ रोजी या परिषदेचा समारोप होणार आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात ही परिषद आयोजीत करण्यात आली आहे. उद्घाटन सोहळ्यास श्रीमंत अमरजीत राजे बारगळ, ज्येष्ठ लेखक विचारवंत रविंद्र मुळे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सह संचालक श्रीराम पांडे, प्र-कुलगुरु डॉ. वाल्मिक सरवदे, रविंद्र सासणकर, सुधीर थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती देणारे एक प्रदर्शन ही कार्यक्रम स्थळी लावण्यात आले होते. त्याचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. श्रीमंत अमरजीत राजे बारगळ म्हणाले की, आजच्या काळात अहिल्यादेवी यांच्या कार्याचे स्मरण होणे आवश्यक आहे. दुष्काळात लोकांच्या हाताला काम मिळून त्यांच्या अन्न पाण्याची सोय व्हावी यासाठी अहिल्यादेवी यांनी ठिकठिकाणी बांधकामे काढली. यामुळे विकास तर झालाच मात्र लोकांना काम मिळून त्यांना अन्न मिळण्याची सोय झाली. अशा प्रकारे आजच्या मनरेगा सारख्या योजनेच्या त्या जनक होत्या. तसेच रस्त्याच्या दुर्तफा सावलीसाठी झाडे लावून सामाजिक वनीकरणाचे काम त्यांनी केले. विहीरी, नद्यांवरील घाट, तलाव यांची बांधकामे करुन जलसंधारणाचे आणि जलव्यवस्थापनाचे काम त्यांनी केले. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या अशा या विविध पैलूंवर अभ्यास होणे आवश्यक आहे. या दोन दिवसीय परिषदेत त्यांच्या विविध प्रशासकीय पैलूवर मंथन व्हावे,असे प्रतिपादन श्री. बारगळ यांनी केले. अहिल्यादेवी ह्या विज्ञाननिष्ठ होत्या. त्यांनी करप्रणालीवर, बाजार व्यवस्थापन, उद्योग व्यापाराला चालना देण्याचे काम आपल्या कार्यकाळात केले, ह्या सर्व बाबींचा अभ्यास होणे व हा इतिहास आजच्या पिढीसमोर आणणे आवश्यक होय,असेही त्यांनी सांगितले.बीजभाषणात रविंद्र मुळे यांनी सांगितले की, इतिहासाचा अभ्यास हा स्वबोध निर्माण करणारा असावा. त्यासाठी इतिहासाची मांडणी व्हावी. त्यादृष्टीने या परिषदेत दोन दिवस विचारमंथन होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पहिल्या दिवशी या परिषदेत हिंदवी स्वराज्य ते हिंदवी साम्राज्य या विषयावर सुधीर थोरात, पुण्यश्लोक अहिल्यादेवी आणि महिला सबलीकरण याविषयावर डॉ.नम्रता भोसले-मोहिते, पुण्यश्लोक अहिल्यादेवी धार्मिक सांस्कृतिक पुनरुत्थान याविषयावर रविंद्र सासमकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी एक कुशल प्रशासक या विषयावर डॉ. अशोक बांगर यांच्या विचारांचे सादरीकरण होईल.

दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि.३ रोजी सकाळी ११ वा. डॉ. श्रीमती योगिता होके पाटील व गोरक्षनाथ अबुज यांचे मार्गदर्शन, दुपारी १२ वा. होळकर घराणे या विषयावर नवनाथ ढगे, दुपारी साडे १२ वा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर- कला आणि स्थापत्य या विषयावर रामभाऊ लांडे, दुपारी १ वा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी –सामाजिक समता याविषयावर डॉ. रमेश पांडव, दुपारी ३ वा. धनंजय धनगर हे मुक्तमंथन करतील, दुपारी ४ वा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे नाट्य श्रीमती अर्चना चितळे ह्या सादर करतील.अभ्यासक, इतिहास संशोधक व नागरीकांनी या दोन दिवसीय विव्दत परिषदेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय विभीषण चवरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *